चार महिन्यांत एक हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या   

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत राज्याच्या विविध भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे ५४ हजार ५३३  हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या  कालावधीत एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. राज्य सरकारने बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकर्‍यांना १३ हजार ८१९ कोटी अद्याप वाटप होणे बाकी आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, असेही ते म्हणाले. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात सरकारी अधिकार्‍यांनी  निष्काळजीपणा केला. याबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने राजशिष्टाचार पाळण्याबाबत पत्रक काढले. तरीही, या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ,  असेही दानवे यांनी सांगितले.
 

Related Articles